महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा येत्या आठवड्यात संपणार असून, या दोन्ही परीक्षांचा निकाल १५ मेपूर्वी जाहीर होणार आहे. निकाल मे महिन्यातच जाहीर होण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागकडून उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे राज्य मंडळाच्या इतिहासातील सर्वांत जलद निकाल यंदा जाहीर होण्याची शक्यता आहे.

बारावीचा निकाल साधारण १० मेपर्यंत, तर दहावीचा निकाल १५ मेपूर्वी प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाच्या वाढत्या संधी लक्षात घेता, राज्य मंडळाने दोन्ही परीक्षा लवकर घेण्यासोबतच त्यांचे निकाल जलद जाहीर करण्याची भूमिका स्वीकारली आहे. त्याचप्रमाणे पुरवणी परीक्षाही जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने मे महिन्याच्या अखेरीस निकाल प्रसिद्ध होत आहे. मात्र, यंदा दोन्ही परीक्षा नेहमीपेक्षा दहा दिवसांपूर्वीच सुरू झाल्याने निकाल जाहीर होण्याची तारीख अलीकडे आली आहे.